टीम लय भारी
मुंबई : शहरात आजसुद्धा पावसाचा जोर कायम आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झाला आहे, त्यामुळे ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, असे मुंबईकरांना प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून आज पुन्हा मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे, परिणामी सखल भागांत पाणी साचू लागले आहे. दरम्यान अंधेरी सबवे पुन्हा पाण्याखाली गेला असून रस्ते सुद्धा पाण्यात बुडाले आहेत. सबवेजवळ पोलिसांकडून बॅरिकेट्स लावण्यात आले असून हा मार्ग बंद करण्यात आला आहे. बीएमसीकडून पंपीग मशिनद्वारे पाणी उपसण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात मुसळधार, अतिमुसळधार पावसाचा अंदाज आज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे, तर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, वाडा, विक्रमगड, तलासरी या ठिकाणी पावसामुळे पूरस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
१३ जुलै २०२२
हवामान अंदाज :-.
मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून वादळी वारे ४५-५५ किमी प्रतितास वेगाने वाहतील— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 13, 2022
दरम्यान, मुंबईच्या मुसळधार परिस्थितीचा अपडेट देण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने सोशल मिडीयावर पोस्ट करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ट्वीटमध्ये महापालिका म्हणते, “मुंबई शहर व उपनगरात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही ठिकाणी अति जोरदार ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अधूनमधून वादळी वारे 45 – 55 किमी प्रतितास वेगाने वाहतील”, असे महापालिकेने म्हटले आहे.
माहीम, दादर, परळ, भायखळा भागांत सुद्धा जोरदार पाऊस कोसळत आहे, परंतु अद्याप लोकल सेवेवर कोणताच परिणाम झालेला नाही, लोकल नियमाप्रमाणे सुरळीत सुरू आहेत, असे असले तरीही नागरिकांनी काळजी घेत प्रवास करा, गरज असेल तरच प्रवास करा अन्यथा प्रवास टाळा असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा…
पुढच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि आपली शक्ती एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल